मातृभाषेतून-शिक्षण

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती आणि नवभारत....

मी गेली ४० वर्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकेतून काम करत आलेलो आहे, प्रत्येक भूमिकेचा धर्म मी अत्यंत प्रभावीपणे निभावला आहे, याची मला जाण आहे. प्रत्येक शिक्षकाने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली तर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास दाखवलेले विश्वगुरू बनण्याचे स्वप्न आपण सहजी साकारू याची मला खात्री आहे.

पार्श्वभूमीः

भारताने विश्वगुरू बनण्याचा निश्चय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून हा ध्यास घेतला आहे. विश्वगुरू बनायचे म्हणजे काय? हे आपण समजून घेतले पाहिजे.

मध्ययुगीन भारतः

लॉर्ड मेकॉले याने १८३५ मध्ये भारतीय शिक्षणाचे जुने सर्व आयाम बदलून कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती आपल्याकडे लादली. 'गुलाम बनवणारी' मेकॉलेची शिक्षण व्यवस्था भारताचा गाभा बनली. गुलाम ही इंग्रजांची गरज होती; स्वतंत्र भारताची नाही. तरीही ही पद्धती गेली दीडशेपेक्षा जास्त वर्ष आपण प्राणपणाने सांभाळतो आहोत. परंतु आत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होऊ घातलेले आहेत.

आपल्याकडे इंग्रज येण्याच्या आधी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरूला अर्थात शिक्षकाला, आचार्य यांना प्रचंड आदराने मानण्याचा प्रघात होता. नव्हे तर ती परंपरा होती.

स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते अशी आपली परंपरा आहे.

म्हणजेच राजापेक्षा विद्वानाला श्रेष्ठ मानणारा भारत आहे. शिक्षणाची परंपरा भारतवर्षाइतकीच प्राचीन आहे.

वेद हा भारतीय संस्कृतीचा प्राचीन ग्रंथ. वेदांना अपौरूषेय म्हणतात. म्हणजे वेद कुणीही लिहिले नाहीत, ते इथेच होते. त्यांचे दर्शन झाले, असे मानले जाते. आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये ६४ कला शिकवल्या जात असत. ज्याला जे आवडते त्यांनी ते शिकावे अशी पद्धती होती सोदाहरण म्हणून आपण द्रोणाचार्यांच्या गुरुकुलाचे उदाहरण घेऊयात: भीमाला धनुष्य शिकवायच्या आवश्यकता नव्हती; अर्जुनाला गदा शिकवण्याची आवश्यकता नव्हती; धर्माला अर्थात युधिष्ठीराला धर्मशास्त्राचे ज्ञान हवे होते! म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो... अशी शिक्षण पद्धती होती. म्हणजे ज्याला जे आवडते त्याने ते शिकावे.

मागची दोन शतके आपण विद्यार्थ्यांवर नव्हे तर समाजावर शिक्षण लादत आलो. ज्याला गणित आवडत नाही त्यालाही गणित शिकवत आलो आणि त्यामुळे आपल्याकडे ट्रेंड बदलत गेले. आता सध्या नीटला किती विद्यार्थी बसावेत याला काही मर्यादाच राहिल्या नाहीत. स्पर्धा परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात आणि त्यातले काहीच पास होतात. म्हणजे आपण मुलांमधली टॅलेंट्स हेरून त्याला त्या त्या क्षेत्रात पुढे नेणं यापासून कुठेतरी लांब गेलो.

शिक्षण व्यवस्था ज्ञान देणारी असावी आणि ते ज्ञान निसर्गाचे, जगणे सुंदर बनवणारे, संपन्न बनवणारे असावे, असे भारतीय परंपरा सांगते. समाजातील सर्व घटकांना त्यांच्या कलानुसार, कौशल्यानुसार शिक्षण मिळावे, अशी ही परंपरा.

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतीय शिक्षण जीवनपद्धती होती. योग, आयुर्वेद, गुरूकुल शिक्षण पद्धती, व्यापार, शस्त्रे, विविध कला-शास्त्रांचे शिक्षण

- आर्यभट्ट, कणाद, चाणक्य, चार्वाक, सुश्रुत, वराहमीहीर, लीलावती, भास्कराचार्यांसारखे विद्वान, नालंदा- तक्षशिला अशी वैभवशाली विद्यापीठे अशी भारतीय शिक्षणाची अफाट परंपरा आपल्याकडे होती.

आजचे बदल

- स्वातंत्र्यानंतर आपण संस्थात्मक पायाभरणी केली. शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार झाला. दर्जाशी तडजोड झाली. शिकून परदेशात जाणाऱ्यांची संख्या सतत वाढते आहे.

- परदेशातील कंपन्यांचे प्रमुख भारतीय आहेत, याचा अभिमान आहेच; पण भारतातील कंपन्या जागतिक दर्जाच्या बनण्यासाठी शिक्षण हवे.

- केवळ नोकरी नव्हे, तर जीवनकौशल्ये विकसित करणारे शिक्षण हवे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०

पहिल्यांदाच भारतीय प्राचीन परंपरेचा विचार शिक्षण धोरणात झाला आहे. शिक्षणाचे भारतीयकरण झालेच पाहिजे. गेली दोन वर्षे मोदी सरकार धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील आहे. आपली वैभवशाली परंपरा आपल्याला ठावूक हवी, आपला प्रगल्भ इतिहास मुलांना शिकवला गेलाच पाहिजे. त्यातील उत्तम ते स्विकारणे आणि आजच्या काळाशी सुसंगत रचना करणे हा धोरणाचा उद्देश आहे.

यासाठी शिक्षक म्हणून शिक्षकाच्या भूमिका बदलाव्या लागतील, केवळ वर्गात जाऊन शिकवणे, म्हणजे शिक्षण देणे नव्हे. ज्ञानाचे हस्तांतरण करणे म्हणजे शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्याला ज्ञानाचा वापर करायला शिकवणे अर्थात कौशल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आणणे. विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढला पाहिजे. यासाठी संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती आणणे आवश्यक आहे. ज्ञान निर्मिती करण्याकडे कल वळायला हवा. ज्याला उद्योजकतेमध्ये आवड आहे त्यांनी व्यावसायिकता जपावी. ज्याला कलेमध्ये आवड आहे त्यांनी कला जपावी. ज्याला क्रीडा अर्थात खेळ जमतो आहे त्यांनी खेळातच भाग घ्यावा. मोदी सरकारच्या धोरणांमुळे खेळांचे महत्व वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये आपल्या सुवर्णपदकांची संख्या वाढते आहे...

विश्वगुरू

भारतीय परंपरेत ज्ञान कधी मर्यादित करून ठेवले नव्हते, ते कधी बंदिस्त नव्हते. अमर्याद ज्ञान खुले करणे ही भारतीय परंपरा. ते लोकांना वाटणे ही परंपरा. या अर्थाने भारत विश्वगुरू बनू शकतो.

केवळ पैसे मिळविण्यासाठी शिक्षण नसते, योगासारख्या शिक्षणाने आयुष्यभरासाठी आरोग्य सुधारते. असे शिक्षण जगाला देणे ही विश्वगुरूची परंपरा.

केवळ उपग्रह बनवणे हे शिक्षण नाही, तर ध्यानात विश्वाचे आकलन होणे ही भारतीय परंपरा. ही विश्वगुरूची परंपरा. इथून पुढच्या काळामध्ये परदेशांच्या लढायांचा अभ्यास करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या लढाया त्याचे व्यवस्थापन याचे धडे आपल्याला यायला हवेत.

अलिकडेच आपण बघितलं की आपला नौसेनेचा ध्वज बदलून त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अतिशय गौरवशाली उल्लेख केला गेला. यालाच शिक्षणाचे भारतीयकरण असे म्हणूयात. आपलं ते सोन असं म्हणायला आपण शिकले पाहिजे. आपल्याकडे आपल्यालाच नावे ठेवण्याची कला कुठेतरी मागच्या काही काळामध्ये विकसित झाली होती. ती आता बदलायला हवी.

चाकोरी बाहेरच्या शिक्षणाकडे आपल्याला भर द्यावा लागेल. केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही तर पारंपारिक ज्ञानाचा सुद्धा वापर झाला पाहिजे. आपल्याकडे भारतीय परंपरांना उज्ज्वल दिवस आणावे लागतील. छोट्या छोट्या परंपरा अभ्यासक्रमात आणून त्याचे छोटे छोटे अभ्यासक्रम करावे लागतील. सुतार काम, लोहार काम, टायर दुरूस्ती अशा कामांचे छोटे अभ्यासक्रम का असू शकत नाहीत? आपल्याकडे ज्या ज्या म्हणून परंपरा आहेत, त्या आदिवासींच्या असतील, मूलनिवासींच्या असतील किंवा वनवासी दलांच्या असतील या सगळ्या परंपरा जोपासून त्यांचे अभ्यासक्रमात रुपांतर केल्यास पारंपारिक ज्ञानाचा वापर वाढेल, अशी मला खात्री आहे. हा विश्वगुरू बनण्याचा रस्ता आहे, याचीही मला खात्री आहे.

राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रात नवतरुण, नवयुवक जे आहेत ते काय करतात त्यावर राष्ट्राचे भविष्य अवलंबून असते. इथून पुढचा काळ हा तरुणांचा आहे आणि म्हणूनच आत्ता आपल्याकडे शिक्षणामध्ये जे प्रचंड बदल होऊ घातलेले आहेत ते आपण सगळ्यांनी कसोशीने अंमलबजावणी करण्यासाठी अमलात आणले पाहिजेत. नवे नवे अंमलबजावणीचा आपण एक घटक झालं पाहिजे आणि ही अंमलबजावणी अति वेगाने करून विश्वगुरूकडे वाटचाल केली पाहिजे.